आज खरच खूप दिवसांनी लिहायला घेतलं… अगदी मोजायचं म्हटलं तर तब्बल तीन वर्षांनी. काही विशेष असं कारण नाही पण कशावर तरी लिहावं असा खरच आतून वाटलं नाही. व्यक्त व्हावं असं वाटलं नाही.
मागच्या आठवड्यात शुक्रवारी (६ मे २०१६) रोजी "सैराट.." नावाचा चित्रपट पहिला.
नागराज मंजुळे लिखित आणि दिग्दर्शित, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू अभिनित, "सैराट…" आणि त्याला अजय-अतुल यांचं कमाल संगीत…. हा चित्रपट पहिल्यानंतर मनात काहीतरी खदखदतय… काहीतरी वरचेवर मनात येतंय…. म्हटलं आज कागदावर उतरवावेत हे विचार…
तसं गेल्या सहा महिन्यात "कट्यार काळजात घुसली (२०१५)" आणि "नटसम्राट (२०१६)" हे दोन अप्रतिम चित्रपट सुद्धा आले आणि सुपरहिट झाले. पण त्या चित्रपटाशी असं आतून connect नाही होता आलं. कट्यार हा एका संगीत नाटकावर बेतलेला किंबहुना संगीतप्रधान चित्रपट. कानाला निरातिशय सुख देणारा चित्रपट… भव्य सेट आणि तगड्या कलाकारांची फौज…. पण एक सामान्य माणूस म्हणून तो चित्रपट आतवर असा खोलवर रुजत नाही.
तशीच काहीशी गत "नटसम्राट" ची. "नाना पाटेकरांचा" अत्त्युच्च अभिनय आणि एकूणच "वी वा शिरवाडकर सरांचं" लेखन हे अद्भुत combination जुळून आलेलं पण तरीही एक सामान्य माणूस म्हणून मी त्या चित्रपटाशी आतून नाही connect होऊ शकत. ती गोष्ट मला माझी नाही वाटत. एका मोठ्या अभिनेत्याचं पडद्यामागचं आयुष्य जरी सामान्य माणसासारखं असलं तरीही ते व्यक्ती म्हणून सामान्य नाहीतच. पण तरीही हे दोन चित्रपट कुठेतरी कायम स्मरणात राहतील. दुनियादारी, टाईमपास, टाईमपास २, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दगडी चाळ, अशी ही बनवा बनवी, आयत्या घरात घरोबा, असे अनेक चांगले चित्रपट पहिले पण त्याविषयी लिहिलं नाही काही पण मग "सैराट"च का?
सिनेमा पाहून तब्बल आठ दिवस उलटूनही तो इतक्या खोलवर का रुजलाय? का त्यातले पात्र, त्यातले संवाद, त्यातली गाणी, त्याचा पूर्वार्ध इतके आपले का वाटतात? का ती इतकी जवळची वाटते कि अक्ख्या महाराष्ट्राने हा सिनेमा इतका डोक्यावर का घ्यावा? ११ दिवसात ४१ कोटी!!!
२-३ वेळा पाहूनही लोकांचं समाधान होत नाहीये?
माझ्यापुरतं बघायचं झालं तर त्या चित्रपटाच्या पूर्वार्धात दाखवलेली गोष्ट इतकी खरी आहे आणि इतकी तंतोतंत जुळते आपल्या बालपणाशी, आपल्या पौगंडावस्थेतल्या प्रेमाशी, आपल्या शालेय वा कनिष्ठ महाविद्यालयातल्या दिवसांशी.
रेल्वेच्या आवाजावर नाचणं , नदीत पोहणं, शेतात भटकण, हे तर आहेच पण त्याही पलीकडे आपल्याला आवडणाऱ्या मुलीची एक झलक मिळवण्यासाठी वाटेल ते करायची तयारी, (मी सुद्धा मला आवडणाऱ्या मुलीला पाहण्यासाठी सकाळी लवकर उठून सायकल चालवायला जायचो न मग बराच वेळ त्याच त्याच रस्त्यावर परत परत सायकल आणणं असं मी पण केलंय.) वर्गात जास्त मार्क्स पडणाऱ्या मुलाविषयी आपसूक वाटणारी उत्सुकता, मनातलं कळवण्यासाठी चिठ्ठीचा खुबीने केलेला वापर, मग त्या चिठ्ठीचं उत्तर येईपर्यंत मनाची होणारी घालमेल, क्वचित प्रसंगी यशस्वी होणारं प्रेम, न नाहीच झालं तर हसत हसत पचवलेला तो प्रेमभंग, जीवाला जीव देणारे मित्र, असं सगळं आपण थोड्याफार फरकाने जगलेलो असतो.
विशेष लक्षात राहतं ते आर्ची हे पात्र… बिनधास्त, प्रामाणिक आणि मनापासून प्रेम करणारं. खरं बोलणारं, डोळ्यातुन बोलणारं. आर्ची आणि परश्या यांचं प्रेम पण तितकच खरं आणि त्या वयातलं वाटतं,
कुठेही भपकेबाजपणा नाही, बॉलीवूडीकरण नाही.
उत्तरार्धाच्या सुरुवातीला प्रेमातूनच वास्तवाची करून दिलेली जाणीव, आणि त्यातून विशेषतः आर्चीची होणारी तडफड, प्रेम तर मिळालं पण पण भुकेचं काय?
सिनेमाच्या शेवटाविषयी मी काहीच बोलू शकत नाही.
पण तरीही लक्षात राहतो तो सिनेमाचा पूर्वार्ध, त्यातले संवाद, त्यातली भाषा, आणि लंगड्या बाळ्या सारखे मित्र, परश्या आणि आर्ची, त्यांचं नातं, त्यांची धडपड, चोरून भेटणं, नकळत एकमेकांना हात लावणं, एकमेकांकडे बघणं, फोनवर बोलतांना जेवण्याचा आग्रह करणं, झाडावर बसणं, रंग खेळणं, सगळच आपलं असं स्वतःच,
खोलवर रुतलेलं,……त्यांची ती भाषा, ते संवाद, अगदी आपले वाटतात..
आणि त्यावर सगळ्यात सुंदर असं उत्कट प्रेम जे प्रत्येकाने एकदा तरी केलेलं असणारच.….
सिनेमातून कोणी काय घ्यावं हा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला मात्र पुर्वार्धाने आयुष्यातील एका पोकळीची जाणीव करून दिली.
ज्यांना असं प्रेम लाभलं असेल त्यांना खूप शुभेच्छा आणि ज्याचं एकतर्फी होतं त्यांना अतिविशेष शुभेच्छा.
वाद, चर्चा तर होणारच, पण सध्या "सैराट"च्या या सैराट यशाचा आनंद घेउ…
बाकी तुम्ही काळजी घ्या, हसत राहा आणि फिट राहा…


