Monday, 19 December 2016

"साऊंड ऑफ वाइल्ड"- आवाज जंगलाचा... एक सुंदर अनुभूती...

जंगल.. अद्भुत अद्वितीय अनाकलनीय असामान्य अमानवी .... पराकोटीची शांतता... तिथे आवाज फक्त निसर्गाचा... पंच महाभूतांचा... जंगलाच्या राजाचा....
जंगल सफारी .... किंवा जंगलात जाणं हा मुळातच माझा छंद आहे असं मी म्हणू शकतो. कारण "रणथंभोर (मार्च २०१५)" आणि "ताडोबा (मार्च २०१६)" नंतर "कान्हा (डिसेंबर २०१६)" ही माझी तिसरी ट्रिप. आणि ह्याच तिसऱ्या ट्रिप नंतर मी माझ्या प्रवासाबद्दल काहीतरी लिहू शकेन हा आत्मविश्वास मला आता आला आहे.
"कान्हा"ला जायचं हे कधी पासूनच डोक्यात होतं कारण खूप ऐकलेलं आणि वाचलेलं होतं  या जंगलाबद्दल. आपल्या "मोगली"चं हे जंगल... अतिशय घनदाट... हिरव्यागार वनराईने नटलेलं.. "कोअर झोन" आणि "बफर झोन" मिळून अदमासे २००० स्क्वेअर किलोमीटर्स चं  हे जंगल मध्यप्रदेशातील "मंडला आणि बालाघाट" ह्या तालुक्यात वसलेलं.
माझा मित्र "श्रीपाद थेटे" याने नुकतीच "साउंड ऑफ वाइल्ड, पुणे" नावाची "वाइल्ड लाईफ टुरिझम" अर्थात "जंगल पर्यटन" हा मुख्य उद्देश्य असणारी कंपनी सुरु केली आहे.  ह्या कंपनी तर्फे ०७ डिसेंबर २०१६ ते १२ डिसेंबर २०१६ असा कान्हा जंगलात जाण्याचा प्लॅन होताच ते ऐकताच मी उड्या मारत तयार झालो आणि ट्रीपच्या तयारीला लागलो.

आवश्यक त्या सर्व औपचारिकता पूर्ण करून एकदाचे आम्ही पाच जणं आणि श्रीपाद असे ७ डिसेंबर २०१६ ला निघालो सायंकाळच्या "पुणे-नागपूर गरीबरथ" ने. मी, श्रीपाद, अर्चित कवीश्वर, हर्षल वाडेकर, प्राजक्ता शिंगवेकर आणि आदिती देशपांडे असे सहा जण होतो ह्या ट्रीपला.


 ८ डिसेंबर ला सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास नागपूर रेल्वे स्टेशन वर पोहोचलो. तर तेथे आम्ही पोहोचण्याच्या आधीच "लखन दादा" नावाचा आमचा चक्रधर आमची वाट पाहत  उभा होता. मारुती सुझुकी अर्टिगा गाडीत आम्ही बसलो सामान बांधलं आणि निघाली आमची स्वारी कान्हा जंगला कडे. नागपूर ते कान्हा २५० किलोमीटर चे अंतर आहे. रस्ता तसा चांगला आहे पण मधला जवळ जवळ १०० किलोमीटर्स चा पट्टा अतिशय खराब आहे. नागपूर-कान्हा रस्त्यावर "पेंच" ह्या जंगलाचे महाराष्ट्रातील भाग तसेच मध्यप्रदेशातील भागही लागतात. कान्हाला, "मुंबई-जबलपूर-कान्हा"  मार्गेही जाता येते.
आमचा परतीचा ११ डिसेंबरचा प्रवास होता, कान्हा-नागपूर अर्टिगाने आणि नागपूर-पुणे गरीबरथने.
१२ डिसेंबर ला सकाळी पुण्यात परत येणार होतो आम्ही.
   
आमची ८ तारखेला दुपारची एक, ९ तारखेला सकाळ-दुपार अश्या दोन, १० तारखेला सकाळ-दुपार-रात्र अश्या तीन, आणि ११ तारखेला सकाळची एक अश्या एकूण ७ जंगल सफारी होत्या. सकाळची सफारी ही पहाटे ६:३० ते ११:०० अशी असते तर दुपारची सफारी ३:०० ते ५:३० अशी असते आणि रात्रीची सफारी सायंकाळी ७:३० ते रात्री १०:०० अशी असते. कान्हा जंगलाच्या कोअर झोनचे  १. सरई, २. किसली, ३. मुक्की  आणि ४. कान्हा असे चार भाग पडतात. सकाळ आणि दुपारच्या सफारी ह्या चार भागातच असतात तर रात्रीची सफारी ही बफर झोन मध्ये असते. आम्ही कान्हा ला पोहोचल्या नंतर आमची राहण्याची आणि खाण्याची सोय "WINDSOR TIGER RESORT" मध्ये केलेली होती. अतिशय स्वच्छ अश्या डबल शेअरिंग एअर कंडिशन्ड रूम्स आधीच आमच्या स्वागतासाठी तयार होत्या. "संतोष दादा यादव" हे आमचे ह्या हॉटेलचे मॅनेजर होते. आणि "विजय दादा" नावाचा आमची केअर टेकर होता.  जंगल सफारी ही सुझुकी कंपनीच्या उघड्या जिप्सी मधून करावी लागते. तर आम्हाला हॉटेल तर्फे एक जिप्सी आरक्षित होती आणि त्याचा चक्रधर हा "रितेश दादा" होता.
राहण्या खाण्याची उत्तम सोय, अंघोळीला आणि प्यायला हवा तेव्हा गरम पाणी. कान्हा मध्ये थंडी खूप असते त्यामुळे गरजेप्रमाणे ब्लँकेट्स ची पण सोय. खायला हवं ते बनवून देणार, दोन वेळेचा चहा, नाश्ता आणि जेवण अशी साग्रसंगीत व्यवस्था होती. साउंड ऑफ वाइल्ड आणि WINDSOR TIGER RESORT ह्यांनी आमची अतिशय उत्तम बडदास्त ठेवली होती. त्याबाबद्दल मी श्रीपाद आणि संतोष दादा ह्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.

जंगलाचे स्वतःचे असे काही नियम आहेत. तिथला राजा हा वाघच. माणूस हा तिथे उपराच. जंगलात खूप आवाज करून चालत नाही, "रंगीबेरंगी, झगामगा मला बघा" असे कपडे घालून चालत नाही, shampoo किंवा साबण किंवा डिओड्रंट आणि perfume  यांचे अनैसर्गिक वास प्राण्यांना चालत नाहीत, प्लास्टिक किंवा कसलाही मानवनिर्मित कचरा केलेला चालत नाही. ह्या बाबतीत मध्यप्रदेश सरकार खूप जास्त कडक आणि particular आहे. आणि ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. रणथंभोर हे कमालीचे व्यावसायिक जंगल आहे आणि ताडोबा हे खूप अव्यवस्थित जंगल आहे, अजिबात शिस्त नसलेलं. त्यामानाने कान्हा हे खूप जास्त वेल managed जंगल आहे. तिथे जिप्सीचा स्पीड हा २० किलोमीटर प्रति तास पेक्षा जास्त नसतो आणि हा नियम तिथले सगळे चक्रधर पाळतात. प्रत्येक जिप्सी सोबत तिथल्या वन्य विभागाचा एक गाईड असतो. तो दर सफारीला नवीन असतो.                                  
जंगल तुम्हाला खूप शिकवतं, ती शांतता, ते आवाज, वाघ दिसण्याची वाट बघत एका जागी थांबणं अगदी काहीही ना करता (मोबाइल स्वीच ऑफ करावे लागतात किंबहुना केलेले चांगले), ते वाघाच्या हालचाली बरहुकूम इतर प्राण्यांनी दिलेले कॉल्स, विशेषतः हरीण आणि माकड.

दिवसा इतकी किर्र झाडी असते की रात्रीचं जंगल किती भयानक असेल, खरंच रात्रीच्या सफारीचा अनुभव कमाल थरारक होता, फक्त जिप्सीच्या हेड लाईटचा तेवढा प्रकाश, बाकी किर्र अंधार, ती भयानक शांतता, रातकिड्यांचा आवाज पिन ड्रॉप सायलेन्स सगळीकडे.... त्यात आम्हाला ससा दिसला, जंगली ससा आणि इंडियन Gaur चं संपूर्ण कुटुंब दिसलं.
दिवसा सफारीला आम्हाला अतिशय दुर्मिळ असा Barasingha, Sambar Deer, Barking Deer, Spotted Deer, Jackal, Indian Gaur असे अनेक प्राणी दिसले, अनेक पक्षी पण दिसले. 

असं  म्हणतात की आपल्याला जरी वाघ दिसला नाही तरी वाघाने आपल्याला पाहिलेलं असतं. 
वाघ हा त्याच्या मर्जीचा मालक आहे, राजा आहे तो, त्याला हवं तेच करणार. आणि त्याला हवं तेव्हाच दिसणार`. अनेकदा आम्हाला अगदी ताज्या पाऊलखुणा दिसायच्या पण वाघ दिसायचा नाही. ७ सफारी पैकी ६ सफारीत आम्हाला एकदाही वाघ दिसला नाही पण शेवटच्या सफारीत आम्हाला एक वाघ दिसला बजरंग नावाचा (हे नाव नंतर कळलं) तो आणि त्याची live in Relationship पार्टनर असे दोघे आपल्या ईश्वरदत्त कर्तव्यासाठी चालले होते. हा वाघ पण इतका लांबून आणि ओझरता दिसला की त्याचे फोटोज काढता नाही आले पण that is  the beauty of the जंगल. कान्हामध्ये मुन्ना, भीमा (नुकताच वारला), किंगफिशर (नुकताच वारला), छोटा मुन्ना, बजरंग, आतंकवादी ह्या आणि अश्या अगणित नावांचे वाघ आहेत आणि जंगलावर राज्य करत आहेत.

प्रत्येक जंगल सफारी ही पुढच्या सफारीचे मोटिव्हेशन देते, आता पुढील पायरी ही बांधवगडाची. तुम्हाला हे वाचून जंगलात जावेसे वाटल्यास नक्की जा आणि साऊंड ऑफ वाइल्ड नक्कीच तुम्हाला यात मदत करू शकेल. पण आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी जंगल अनुभवावेच. 

शांतता.... शांतता... अंगावर येणारी शांतता.....  


Image Courtesy: Wikipedia and Mr. Shripad Thete. 

Thank you @SoundOfWildPune. 

-ईशान कुलकर्णी      
                
    

Friday, 29 July 2016

मान्यता..


रोजच्या सवयीप्रमाणे त्याने मोबाईल हातात घेतला, चॅट विंडो उघडली आणि तिचं "लास्ट सीन" बघितलं. वेळेचा अंदाज घेतला आणि मनाशी काहीतरी ठरवुन मोठा  मेसेज टाईप करायला घेतला. बराच वेळ काहीतरी लिहीत होता, खोडत होता, असा खेळ करून शेवटी त्याने "गुड मॉर्निंग" असा मोघम मेसेज पाठवला. तोही कुठल्याही इमॉटीकॉन शिवाय.
त्याचं असं गेले काही दिवस सारखंच चाललेलं होतं. खूप काही आहे त्याच्या मनात, बोलायचंय, सांगायचंय पण काही केला तो मोठा मेसेज काही जात नव्हता. उगा धाकधूक त्याच्या मनात की ती वाचेल ना, तिच्या ऐवजी दुसऱ्या कोणी वाचला तर, आणि precisely तिच्या नवऱ्याने वाचला तर? विचारानेच कसं  तरी होत होतं त्याला. बरं साधे सरळ रोजच्या जीवनातले विषय, नोकरी , लग्न किंवा नव्याने केलेलं लिखाण अश्या आशयाचा काहीतरी मोठा मेसेज असणार तो, पण तरी गाडी काही पुढे सरकत नव्हती. एकदा मनाचा हिय्या करून फोन करायला घेतला त्याने पण घड्याळातील काटा नवाच्या पुढे गेलेला पाहून फोन आपोआपच बंद झाला. की इतक्या उशीरा कसा फोन करायचा? शंकांचं काहूर मनात. असं काही खूप दिवस झाले नव्हते तिच्या लग्नाला... फक्त १५ दिवस.... हो हो फक्त पंधरा....

असे काही खूप दिवस नव्हते त्यांच्या मैत्रीला... इन मिन ३२० दिवसांपूर्वीची मैत्री म्हणजे पुरतं एक वर्ष पण नाही.. पण त्या काही दिवसातच त्यांची मैत्री खूप घट्ट झाली अगदी घष्ट... त्याच्या आयुष्यातलं तिला सगळा माहित आणि तिच्या आयुष्यातलं त्याला.. इथपर्यंत नाही तर एकमेकांच्या घरी पण सगळे नीट ओळखणार..

त्यांचं पण ते रोजचं  बोलणं, कधी मधी भेटणं चहा पिणं एखादा movie  बघणं, हे तर होतंच पण त्या पलीकडे एक understanding होतं, धाक होता, समजूतदारपणा होता. तिच्या लग्नात तर तो त्याच्या घरातलं कार्य असल्यासारखा वावरला जणू तिच्या आई बाबांचा उजवा हातच.

होता? भूतकाळ? past tense?  तिचं, त्याच्या बेस्ट friend चं लग्न झालं आणि सगळा वर्तमानकाळ अचानक भूतकाळात गेला?  अचानक एक कुठली भिंत मध्ये आली?

"खूप छान नवरा मिळालाय तिला, समजूतदार, कर्तृत्ववान, त्यांच्या घरातला सगळ्यात मोठा, जबाबदार, सासरच्यांची खूप काळजी घेणारा आणि पर्यायाने तिची पण काळजी घेणारा, मुळात लग्न इतक्या झटकन झालं की त्याच्याशी नीट भेटणं बोलणं पण होऊ नाही शकलं." असं तोच परवा कोणालातरी सांगत होता.
मग तरीही त्याच्या मनात काय आणि कसले प्रश्न आहेत?

कदाचित त्याला असं तर वाटत नाहीये ना की "बायकोचा मित्र" किंवा "सुनेचा मित्र" म्हणून त्याला "बायकोच्या मैत्रिणी " किंवा "सुनेच्या मैत्रिणींना" जितका मिळेल तितका मान मिळणार नाही?
एखादी गोष्ट share  करायला त्याने अचानक तिला फोने केलेला (वेळेचं भान पळून) तिच्या नवऱ्याला चालणार नाही?
तो लग्नाआधी सारखं तिला "भेटूयात का COFFEE ला?" असं विचारू शकणार नाही?
तिचा नवरा ह्याला आणि तिच्या नवऱ्याला हा एकमेकांच्या आयुष्यात समाविष्ट करून घेऊ शकणार नाही का?
 बायकोचा मित्र किंवा सुनेचा मित्र हि संकल्पना अजूनही इतकी दुर्मिळ का आहे आपल्याकडे?
त्याचं तिच्याशी असलेलं understanding तिच्या नवऱ्याशीही तितकच असेल का?
त्याला परत तिला कधीच "आज मला फक्त तुला भेटायचंय किंवा तुझ्याशीच बोलायचंय" असं म्हणता येणार नाही का?

असे काही प्रश्न बहुदा त्याच्या डोक्यात सैरावैरा पळत आहेत आणि म्हणूनच तो सैराट झालाय... हुकलाय, कळत नाहीये त्याला काय करावं ते..... तिच्या आई बाबांना भेटायला जातांना सुद्धा brave  असल्याचा खोटा आव आणतोय का तो? तिच्या आई बाबांइतकाच तोही सैरभैर झालाय का? आई बाबांची ती एकुलती एक मुलगी आहे तशी त्याची पण ती एकुलती एक Best Friend आहे ना?

आज तब्बल २२ दिवसांनी तो भेटला तिला पण काय बोलावं ते कळलं नाही त्याला, तिला पण काहीतरी चुकल्यासारखं वाटलं तेव्हा... तिच्या जागी ती १००% बरोबर आहे पण त्याच्या जागी तो?
ती सतत आहे तशीच वागतीये आहे तशीच बोलतीये पण आजूबाजूची परिस्थिती आणि situation बदललीये का पण? तिने तरी त्याला कसं  समजवावं आणि त्याने तरी तिला सगळं कसं स्पष्ट करून सांगावं?

होईल नॉर्मल सगळं कदाचित. तिच्या "नसण्याची" किंवा "मर्यादित असण्याची" सवय तो करून घेईल बहुदा. किंवा कदाचित सगळं ......... Another fairy tale का सत्य वाचन....
आणि हे सगळे त्याच्याच डोक्यातले विचार आहेत बहुदा...

तंद्रीतून बाहेर येत त्याने mobile  खिशात टाकला आणि laptop  उघडून कामाला लागला. mobile  खिशातच टाकला, साईडला नाही ठेवला, उगाच का ते मोहाचे क्षण आणि लक्ष विचलित.
जेमतेम पाच मिनिटे झाले असतील नसतील तोच त्याचा mobile  वाजला. आता कोणाचा फोन म्हणून वैतागून त्याने फोन बघितला तर स्क्रीन वर तिच्या नवऱ्याचे नाव... ह्याने फोन उचलला आणि पलीकडून शब्द उमटले, "HI, उद्या रात्री डिनर प्लॅन करतोय, आपण तिघं मस्त जेवु आणि मग एक मस्त मूवी ला जाऊ टिकेट्स मी ऑलरेडी काढली आहेत आणि हॉटेल पण ठरलंय सो, I'm not asking your permission Sir, but you have to come. ओके थांब हिच्याशी बोल... " आणि त्याने फोन कट केला... तिच्याशी ना बोलताच....     

कदाचित त्याच्या मनात आलं असेल, "ती पण अशीच ऑर्डर सोडते, असाच हट्ट करते ..... Another Fairy Tale"

स्वतःशीच हसून त्याने फोन परत खिशात नाही नाही आता साईडलाच ठेवला ..... आणि Fairy  Tale  हा शब्द घोळवत कामाला लागला.       


जुनी सवय आहे मला
बागेत जाऊन बसण्याची,
अजूनही खात्री वाटत नाही मला,
तू तिथे नसण्याची.

-ईशान कुलकर्णी 

        


                   

Sunday, 5 June 2016

"तू.."

प्रिय "तू"स,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
कशी आहेस? खर तर हे माझं तुला लिहिलेलं पहिलच पत्र. तू म्हणालीस की तुझ्याविषयी, तुझ्या आयुष्याविषयी लिहिशील का? मी जर चाटच पडलो. म्हटलं असं कसं लिहिणार आणि लिहायचं म्हटलं तरी सगळं नीट मनापासून लिहिलं पाहिजे, तुझ्याविषयी माझ्या मनात असलेल्या भावना, तुझे चांगले, वाईट गुण, आवडत्या आणि नावडत्याही गोष्टींचा उल्लेख येणार आणि जर तो नाही आला तर मग अख्खं लिखाणाच मिळमिळीत होऊन जाईल एखाद्या राजकारण्याने दिलेल्या paid  news  सारखं. पण मग म्हटलं लिहावं, लिहून तर बघू. मी पण असं कोणाविषयी direct लिहिलं  नव्हतं  कधी.
तुला आठवतं, आपल्या पहिल्या समोरासमोरील भेटीत पाऊस पडला होता. मला पाऊस अजिबात आवडत नाहीआणि तुला मात्र भयंकर आवडतो. कदाचित हा पहिला विरोधाभासच आपल्या मैत्रीची आश्वासक सुरुवात करायला कारणीभूत ठरला असावा. सप्टेंबर २०१५ मध्ये मी लिहिलेलं "क्षणभंगुर.." नावाचं  नाटक पहायला आलेलीस तू, पण नाटक झाल्यावर येउन भेटली नव्हतीस. पण मग मी तुझ्याशी फेसबुकवर बोललो पहिल्यांदा. त्यासाठी मला तुझ्या "ही" आणि "ती" अशा दोन मैत्रिणींची रीतसर परवानगी काढायला लागलेली. त्यातली "ही" तर माझीच मैत्रीण आणि "ती" माझ्या मित्राची होणारी बायको. पर्यायाने तू,ही आणि ती आता माझ्या खास मैत्रिणी. ही आणि ती दोघीही मला म्हणालेल्या की "बिनधास्त बोल "तू"शी, तिची काळजी घे, जमल्यास तिचा खूप चांगला मित्र हो, आम्ही दोघी तिथे नसतो आजकाल, तू असलास म्हणजे मग काही tension  नाही."
आणि मग finally आपण बोलायला लागलो. मग कालांतराने तू मला तुझा mobile  number  दिलास, आणि मग सुरु झाला हा सगळा प्रवास. माझा पटकन involve होणारा स्वभाव आहे तर तुझा जर सांभाळून वागण्याचा आणि मग माणूस पारखून involve होण्याचा. त्यामुळे तुझा विश्वास संपादन करायला आणि आपलं  sharing  वाढवायला मला खूप कष्ट घ्यावे लागले हे सांगायला नकोच.
तुझा एकूणच मोकळा स्वभाव आणि सगळ्यांना सांभाळून घेण्याच्या स्वभावामुळे मी पण जर जास्तच मोकळेपणाने वागू लागलो आणि मग मला आठवतं  की तू मला चांगली तंबी दिलेलीस की "माझा मोकळेपणा हा शुद्ध मैत्रीपोटी आहे, याचा दुसरा कुठलाही अर्थ काढू नकोस" अगदी हेच वाक्य नसलं  तरी याच अर्थाचं बोलली होतीस. पण त्यात तुझी चूक नव्हती, वहावत  जाणे हा माझा स्वभावधर्मच आहे. मलाही कुठे थांबावं  हे कळत नाही.  पण मग तरी तेव्हा तू सांभाळून घेतलस.
तुझा स्वभाव खूप positive  आहे किंवा तू म्हणतेस तसा तो झालाय. तू पण खूप माती खाललीयेस आयुष्यात असं  तुझं म्हणणं आहे, कदाचित ते असेलही खरं पण तरीही तुझ्या स्वभावातला सगळ्यात पहिला गुण कुठला लक्षात येतो तो हाच positive  attitude. स्वतः बाबतीत जरा कमी पण दुसऱ्यांना  समजावतांना कमालीची optimistic असतेस तू. आरडा ओरडा करणे हाही तुझ्या स्वभावाचा एक स्थायी भाव. पण ठीके काही individual  characteristics असतात प्रत्येकाचे. माझा नाहीका, पहिला विचार कायम negative च असतो.

आयुष्यात दोनदा प्रेमात पडलीस तू. एकदा "हा" आणि मग "तो". प्रेम यशस्वी झालं  तर कोणीच काही बोलत नाही. पण फसलं तर मोठी माणसं शेण खाल्लस  आणि मित्र माती खाल्लीस असं  म्हणतात.
पण प्रेमात चूक बरोबर असं काही नसतं असं  मला वाटतं कारण त्या वेळी आपल्या मनाला तेच बरोबर वाटत असतं. त्यातल्या एका वेळी तर तुला खूप जास्त त्रास झाला. त्रास झाला का तू करून घेतलास या वादात आपण नको पडायला कारण शेवटी ज्याची जळते त्यालाच कळते. "हा" काही तुला फलदायी ठरला नाही आणि "हा" विषयी आपण जास्त बोललोच नाहीये त्यामुळे त्याविषयी जास्त भाष्य करणं योग्य दिसणार नाही.
"तो" ला किमान मी भेटलोय तरी पण त्याच्या स्वभावाचा विशेष अंदाज नाही आला पण मग तरी तो ठाम नाही वाटला कधी कायम दोलायमान आणि हे मी तुला म्हणालो पण होतो.
त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय तू एकदा नाही दोनदा घेतलास आणि त्यामुळे तुझा "ही"च्याशी आणि "ती"च्याशी जरा वाजल पण. तो निर्णय चूक होता का बरोबर हे आत्ता किंवा त्यावेळेसही सांगता आलं  नसतं. कुठल्याही निर्णयाचे पडसाद कालांतराने उमटतात. आणि मग ठरतं  की निर्णय चांगले का वाईट ते. पण "तो" पण तुला काही फलदायी ठरला नाही. "तो" साठी तू अनेक मनस्तापही सहन केलेस, परत ताण घ्यायला सुरुवात केलीस. बऱ्याच गोष्टी निश्चित करूनही आयत्या वेळेस "तो" काही हजार झाला नाही.
ह्या सगळ्यात जर काय खरा असेल तर तुझ्या मनातल्या भावना, त्याला प्रेम म्हणा, काळाची गरज म्हणा किंवा आकर्षण म्हणा पण तू कायम तुझ्या मताशी ठाम राहिलीस. आणि हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं  होतं. मग तुझं  लग्न ठरलं , काहीश्या संमिश्र भावनांत तू हा निर्णय घेतलास, अनेक चांगल्या गोष्टी दिसत आहेत, सगळा नीट पार पडतंय पण तुझ्या मनात अजूनही ही शंकाआहेच की "हाच" शी लग्न करण्याचा मी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना, "हाच" हा माझा Mr. Perfect आहे ना? लग्न आणि कुटंब सगळाच नवीन असण्याने येणारे नवनवीन अनुभव तुझं  मन बावचळून टाकत आहेत. आणि राहून  राहून एकाच प्रश्न मनात येतोय की हे सगळं  का? आणि मीच का? कदाचित "ही" आणि "ती" यांचं  ठरलेलं love  marriage पाहून तुझ्या मनात शंका असेल की मग मीच arrange marriage का? कुठेतरी insecurity  आहे मनात "तू"झ्या. पण मी माझ्या आजवरच्या अनुभवाने एकच  सांगेन की our whole life is a gamble. इतरांना देण्यासाठी तुझ्यात असलेली positivity इथे तू वापर. तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, अनेक भावना आहेत, अनेक शंका आहेत, अनामिक भीती आहे एकूणच लग्नाची आणि त्यानंतरच्या सगळ्याच गोष्टींची. कुठेतरी अजूनही "तू"ला असा वाटतंय की "हाच" ला तू अजूनही ओळखू शकलेली नाहीस. आणि ह्यात तुला "मी", "ही" आणि "ती" समजून घेत नाही आहोत. पण असं काही नाहीये. आम्ही तुझ्या इतकेच आनंदी आणि आशावादी आहोत. तुझं  चांगलं  व्हावं हेच आमचं ध्येय आहे.  सगळं नीट होईल.                                         
तुला सख्खा भाऊ किंवा बहिण नसल्यामुळे सगळ्या कामाचा ताण तुझ्यावर पडत आहे आणि "तू"झ्या आई बाबांवर पण. त्यामुळे तुझी होणारी घालमेल, सगळ्या गोष्टी manage करतांना होणारी ओढाताण आणि "हाच"ला द्यावा लागणारा वेळ हे सगळं manage  करतांना प्रचंड दमछाक होतेय तुझी हे मला कळतंय.
पण तरीही मी हेच म्हणेन सगळं नीट होईल. फक्त झोप पूर्ण कर नीट.

तुला राग पटकन येतो, तुला इगो पण आहे, लग्न झाल्यावर सगळे बदल फक्त "तू" च का अनुभवायचे?
तू बोलघेवडी आहेस राग जितक्या लवकर येतो तितक्या लवकर पळतो पण, आई बाबांवर मनापासून प्रेम करतेस. "ही" आणि "ती" साठी जीव ओवाळून टाकतेस, त्यांच्यासाठी possessive होतेस, खूप चांगली listener  आहेस आणि तितकीच काही बाबतीत stubborn  पण. अनोळखी लोकांशी छान बोलतेस मह तू बागेतला watchman असू दे किंवा फिरायला येणारे आजोबा किंवा hotel मधला waiter.
बडबड्या स्वभावापायी माणसं जोडतेस आणि अगदी क्वचित गमावतेस पण.
आता थोडं माझ्या मनातलं.
मला तू पहिल्या भेटीपासून आवडलीस. ह्याला मला कुठलही नाव द्यायचं नाही. मला कधीच तुझ्यासारखी मैत्रीण नव्हती. आणि हेच मला कायम तुझ्याशी जोडून ठेवतं. मी तुझ्यावर line  मारतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आपली मैत्री टिकावी ही माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि तसच  होईल असा आशावाद मी बाळगून आहे. उगाचच मला कदाचित काही घडलं असतं  तर वगैरे असे फाटे फोडायचे नाहीत. जे होतंय ते छानच होतंय आणि चांगलंच  होतंय. आणि चांगलंच होणार.

हे सगळं  वाचून judgemental होऊ नकोस. फारसा विचारही करू नकोस. तुझं  आयुष्य फक्त माझ्या नजरेतून बघत आहेस असं समज. कुठलीही शंका मनात ठेवू नकोस. वाचून झालं  की सांग delete  करून टाकेन.
तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा.
GOD BLESS YOU               
                                                                                                                            तुझा मित्र,
                                                                                                                                "मी"      
                     

Tuesday, 17 May 2016

प्रेमपत्र……

प्रिय ….

खरतर "प्रिय……. " ही खूप औपचारिक सुरुवात वाटते नाही? आणि ती पण एका प्रेमपत्राची?
हे माझं  पहिलच आणि शेवटचं प्रेमपत्र…. कारण यापुढे कोणासाठी लिहू शकेन असं आत्ता तरी वाटत नाही.
पाहिलं प्रेमपत्र हे पहिल्या प्रेमाइतकच ताजं टवटवीत असतं. बघ ना म्हणजे प्राणाहूनही अधिक प्रिय असणाऱ्या तुला प्रेमपत्रात "प्रिय" म्हणणं ही औपचारिकता वाटायला लागली बघ.

कशी गमंत असते बघ ना, अचानक तू समोर येणं, मी तुला पाहणं  आणि तू हसून प्रतिसाद देणं ही एक साधी सरळ घटना. फार काही विशेष नाही, अश्या अनेक व्यक्तींना आपण भेटतो आणि मग विसरूनही जातो. पण तरीही तुला पाहता क्षणी असं वाटलं की तुला मनावेगळ करणं अशक्य आहे. ते तुझं पहिलं हास्य आणि पहिलं हस्तांदोलन आणि मग सुरु झालेला अख्खा प्रवास हा स्वपनवतच. हळू हळू आपण कधी बोलायला लागलो, हसायला लागलो, चर्चा करायला लागलो, अनेकदा कारणाशिवाय ही  भेटायला लागलो, सुख दुःख वाटून घ्यायला लागलो, कळलंच नाही गं. तू पहिल्या भेटीत विश्वासाने हातात दिलेला तो हात नकळत पणे इतका जवळचा कसा झाला कळलंच  नाही.
तुझं  असणं, तुझं नसणं, तू नसतांनाही आहेस असं वाटणं, तुझी वाट  बघणं, तुला येतांना बघून आपसूक केस नीट करणं, व्यवस्थित असलेला shirt पुन्हा एकदा नीट "इन" करणं, पोटात पडलेला तो खड्डा, मग प्रत्येक भेटीत माझा सवंगडीच बनून गेला.
तू अगदी सहज मारलेल्या त्या मिठीतून मला माझ्यातलं मी पण गवसलं, मला एक आत्मविश्वास आला की "येस, मी पण कोणीतरी आहे". भेटायला आल्यावर आणि निघतांना अशी दोन्ही वेळेला मारलेली ती मिठी मग प्रत्येक भेटीतल्या कॉफी इतकीच नित्याची होऊन गेली.
कोणासाठी तरी अधीर होणं, झुरणं, तळमळण, तडफडण, हे असे चेष्टा मस्करीतले शब्द माझे मित्र बनले गं. अलंकारिक वाटणारे हे शब्द मला सहज अगदी सहज बोलता यायला लागले. नव्हे अनुभवता यायला लागले. अख्खी रात्र जागून काढणं  काय असतं ते मी पहिल्यांदा अनुभवलं. तू मध्ये गावाला गेलेलीस आणि एकदम पंधरा दिवसांनी आपण भेटलो तेव्हा तू नेहेमीच्या सहजतेने मला भेटलीस पण माझ्यासाठी तो क्षण काय होता हे माझं  मलाच माहिती. एखाद्या लहान मुलाला एखादंच chocolate हवं  असतांना अचानक त्याला अख्खी बरणी उघडून दिल्यावर त्याचं काय होतं  ना अगदी तसं काहीसं झालं  बघ. आनंदाने ओरडावसं वाटत होता, नाचावंसं वाटत होतं. भावनांवर नियंत्रण ठेवणं कसं जमवलं  मी ते माझं मलाच माहिती.

खूप आनंद होतो तुला भेटल्यावर आणि खूप त्रासही होतो भेटून निरोप घेतांना. काही तासांपूर्वी भेटलेलो असतांनाही हात परत परत mobile कडे जातो, तुझं "Last Seen" पाहण्यासाठी, तुला message करण्यासाठी. आपण खूप मागे लागत नाहीयेना ही सततची शंका, तू माझा विचार करत नसतांनाही तुला काय वाटेल यावरून माझी अख्खी दिनचर्या ठरते. तुझ्या प्रत्येक वाक्याला मी "Judgemental" होतो आणि मग माझं  मत तयार होतं.
माझं  राहणं, बोलणं, वागणं, सगळं तुझ्या परिघाभोवती फिरत राहतं. तुझा प्रत्येक profile picture  मी दोनदा like केलाय, एकदा Facebook वर आणि एकदा मनात, त्या फोटोत तुझ्याशेजारी स्वतःला imagine  करून.
तुझे आणि माझे एकत्र फोटो ज्या laptop  मध्ये आहेत तो laptop  मी दिवसातून तीनदा antivirus  scan  करून घेतो. आपलं  आजवर झालेलं प्रत्येक chat मी स्वतःला email करून ठेवलय.

तू दुसऱ्या कोणाशी बोलतांना मला त्रास होतोच नक्कीच होतो. पण कुठेतरी तू तुझं माझ्यासोबत असणं  इतकं मोठं  करून टाकतेस की मग ही jealousy मग क्षुद्र वाटायला लागते. मला तुझ्यावर बेफाम होऊन प्रेम करायचं, बेधुंद होऊन प्रेम करायचय, तुझ्या त्या घट्ट मिठीच्या आवेगात स्वतःला झोकून द्यायचय, तुझे हात हातात घ्यायचेत, तुझे एखाद्या लहान मुलाप्रमाणे लाड करायचे आहेत आणि मला तुझ्याकडून करूनही घ्यायचे आहेत. तुझ्या मांडीत डोकं ठेवून झोपायचय, तुला कुशीत घ्यायचय, सकाळी उठल्यानंतर तुझ्यासाठी bed tea  करून आणायचाय, मला तुझ्यासोबत म्हातारं  व्हायचय, तुझ्या सोबत आयुष्य काढायचंय, तुझ्या प्रेमात स्वतःला आकंठ बुडवायचय.

तू करशील माझा स्वीकार? देशील मला एक संधी आपलं  आयुष्य घडवायची? होशील माझ्या साध्या आयुष्यातली माझी साधी जोडीदारीण? मोठ मोठ्या बाता मारता येत नसल्या तरी एक नक्की सांगेन आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा सकाळी उठून बाजूला बघशील तेव्हा तुला पश्चात्ताप होणार नाही असा आयुष्य नक्की घालवशील माझ्यासोबत. तुझ्या उत्तराची……… 

हा शेवटचा परिच्छेद मुद्दाम खोडला, आणि हा नवीन लिहायला घेतला, खूप छान वाटलं परवा  तू मला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिलीस. लग्नानंतर तिथेच म्हणजे अमेरिकेत settle  होण्याचा plan  आहे. हे ऐकून थोडा त्रास झाला पण खरच खूप अभिमान वाटला. हे खरतर एक प्रेमपत्र होतं, आता ते फक्त पत्र आहे. वाचून चिडू नकोस judgemental होऊ नकोस. तुझ्यासाठी लिहिलेलं त्यामुळे तुला देऊन टाकणं भाग आहे. माझ्या मनावरचा ताण उतरला. तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काळजी घे आणि संपर्कात रहा.

                                                                                                                      तुझा  …… 

ता. क. आजही हे पत्र माझ्या माळ्यावरच्या पेटीत जसं  च्या तसं  पडून आहे पत्ता न टाकलेल्या पांढऱ्या शुभ्र पाकिटात.    

  
                                         
                   







Thursday, 12 May 2016

सैराट…. का?

आज खरच खूप दिवसांनी लिहायला घेतलं… अगदी मोजायचं म्हटलं तर तब्बल तीन वर्षांनी. काही विशेष असं कारण नाही पण कशावर तरी लिहावं  असा खरच आतून वाटलं नाही. व्यक्त व्हावं  असं  वाटलं  नाही.
मागच्या आठवड्यात शुक्रवारी (६ मे २०१६) रोजी "सैराट.." नावाचा चित्रपट पहिला.
नागराज मंजुळे लिखित आणि दिग्दर्शित, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू अभिनित, "सैराट…" आणि त्याला अजय-अतुल यांचं  कमाल संगीत…. हा चित्रपट पहिल्यानंतर मनात काहीतरी खदखदतय… काहीतरी वरचेवर मनात येतंय…. म्हटलं  आज कागदावर उतरवावेत हे विचार…

तसं गेल्या सहा महिन्यात "कट्यार काळजात घुसली (२०१५)" आणि "नटसम्राट (२०१६)" हे दोन अप्रतिम चित्रपट सुद्धा आले आणि सुपरहिट झाले. पण त्या चित्रपटाशी असं  आतून connect  नाही होता आलं. कट्यार हा एका संगीत नाटकावर बेतलेला किंबहुना संगीतप्रधान चित्रपट. कानाला निरातिशय सुख देणारा चित्रपट… भव्य सेट आणि तगड्या कलाकारांची फौज…. पण एक सामान्य माणूस म्हणून तो चित्रपट आतवर असा खोलवर रुजत नाही.
तशीच काहीशी  गत "नटसम्राट" ची. "नाना पाटेकरांचा" अत्त्युच्च अभिनय आणि एकूणच "वी वा शिरवाडकर सरांचं" लेखन हे अद्भुत combination जुळून आलेलं पण तरीही एक सामान्य माणूस म्हणून मी त्या चित्रपटाशी आतून नाही connect होऊ शकत. ती गोष्ट मला माझी नाही वाटत. एका मोठ्या अभिनेत्याचं पडद्यामागचं  आयुष्य जरी सामान्य माणसासारखं असलं तरीही ते व्यक्ती म्हणून सामान्य नाहीतच. पण तरीही हे दोन चित्रपट कुठेतरी कायम स्मरणात राहतील. दुनियादारी, टाईमपास, टाईमपास २, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दगडी चाळ, अशी ही बनवा बनवी, आयत्या घरात घरोबा, असे अनेक चांगले चित्रपट पहिले पण त्याविषयी लिहिलं  नाही काही पण मग "सैराट"च का?

सिनेमा पाहून तब्बल आठ दिवस उलटूनही तो इतक्या खोलवर का रुजलाय? का त्यातले पात्र, त्यातले संवाद, त्यातली गाणी, त्याचा पूर्वार्ध इतके आपले का वाटतात? का ती इतकी जवळची वाटते कि अक्ख्या महाराष्ट्राने हा सिनेमा इतका डोक्यावर का घ्यावा? ११ दिवसात ४१ कोटी!!!
२-३ वेळा पाहूनही लोकांचं समाधान होत नाहीये?
माझ्यापुरतं  बघायचं झालं  तर त्या चित्रपटाच्या पूर्वार्धात दाखवलेली गोष्ट इतकी खरी आहे आणि इतकी तंतोतंत जुळते आपल्या बालपणाशी, आपल्या पौगंडावस्थेतल्या प्रेमाशी, आपल्या शालेय वा कनिष्ठ महाविद्यालयातल्या दिवसांशी.

रेल्वेच्या आवाजावर नाचणं , नदीत पोहणं, शेतात भटकण, हे तर आहेच पण त्याही पलीकडे आपल्याला आवडणाऱ्या मुलीची एक झलक मिळवण्यासाठी वाटेल ते करायची तयारी, (मी सुद्धा मला आवडणाऱ्या मुलीला पाहण्यासाठी सकाळी लवकर उठून सायकल चालवायला जायचो न मग बराच वेळ त्याच त्याच रस्त्यावर परत परत सायकल आणणं असं  मी पण केलंय.) वर्गात जास्त मार्क्स पडणाऱ्या मुलाविषयी आपसूक वाटणारी उत्सुकता, मनातलं कळवण्यासाठी चिठ्ठीचा खुबीने केलेला वापर, मग त्या चिठ्ठीचं उत्तर येईपर्यंत मनाची होणारी घालमेल,  क्वचित प्रसंगी यशस्वी होणारं  प्रेम, न नाहीच झालं  तर हसत हसत  पचवलेला तो प्रेमभंग, जीवाला जीव देणारे मित्र, असं  सगळं आपण थोड्याफार फरकाने जगलेलो असतो.  

विशेष लक्षात राहतं  ते आर्ची हे पात्र… बिनधास्त, प्रामाणिक आणि मनापासून प्रेम करणारं. खरं  बोलणारं, डोळ्यातुन  बोलणारं. आर्ची आणि परश्या यांचं  प्रेम पण तितकच खरं  आणि त्या वयातलं  वाटतं,
कुठेही भपकेबाजपणा नाही, बॉलीवूडीकरण नाही.
उत्तरार्धाच्या सुरुवातीला प्रेमातूनच वास्तवाची करून दिलेली जाणीव, आणि त्यातून विशेषतः आर्चीची होणारी तडफड, प्रेम तर मिळालं  पण पण भुकेचं  काय?

सिनेमाच्या शेवटाविषयी मी काहीच बोलू शकत नाही.

पण तरीही लक्षात राहतो तो सिनेमाचा पूर्वार्ध, त्यातले संवाद, त्यातली भाषा, आणि लंगड्या बाळ्या सारखे मित्र, परश्या आणि आर्ची, त्यांचं  नातं, त्यांची धडपड, चोरून भेटणं, नकळत एकमेकांना हात लावणं, एकमेकांकडे बघणं, फोनवर बोलतांना जेवण्याचा आग्रह करणं, झाडावर बसणं, रंग खेळणं, सगळच आपलं असं  स्वतःच,
खोलवर रुतलेलं,……त्यांची ती भाषा, ते संवाद, अगदी आपले वाटतात..

आणि त्यावर सगळ्यात सुंदर असं उत्कट प्रेम जे प्रत्येकाने एकदा तरी केलेलं  असणारच.….              
सिनेमातून कोणी काय घ्यावं  हा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला मात्र पुर्वार्धाने आयुष्यातील एका पोकळीची जाणीव करून दिली.

ज्यांना असं प्रेम लाभलं  असेल त्यांना खूप शुभेच्छा आणि ज्याचं एकतर्फी होतं त्यांना अतिविशेष शुभेच्छा.

वाद, चर्चा तर होणारच, पण सध्या "सैराट"च्या या सैराट यशाचा आनंद घेउ…

बाकी तुम्ही काळजी घ्या, हसत राहा आणि फिट राहा…