नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मागील वर्षात तुम्ही खूप धमाल केली असेलच आणि ह्याही वर्षात करणार आहात. माझ्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा.
खर सांगायचं तर मी मागील कित्येक वर्ष "३१ डिसेंबर" अर्थात या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाचे स्वागत या हेतुपुरस्कृत काहीही करणं सोडून दिलंय. ह्याही वर्षी काही विशेष केलं नाही. अत्यंत सध्या पद्धतीने शेवट आणि सुरुवात केली. पण दुसऱ्या दिवशी अर्थात १ जानेवारी २०१२ ला रविवारची सुट्टी असल्या कारणाने कुठेतरी शांत आणि निर्मळ ठिकाणी जाऊन वर्षाची सुरुवात करायची असं असल्या कारणाने मी, केतन, गौरव आणि स्वप्नील सकाळचा चहा घेऊन बाहेर पडलो. आणि रस्ता पकडला तो पुणे-मुंबई महामार्ग.
पहिला तळ दिला तळेगावच्या अलीकडे "शेलारवाडी किंवा बेगडेवाडी" लेण्यांच्या पायथ्याशी. आधी मस्त मिसळ-पावचा नाश्ता केला आणि चढायच का नाही यावर विचारविनिमय केला. मग एकदाचे चढायला लागलो. साधारण २०० पायऱ्या, दोन शंकराची मंदिर आणि काही ओस पडलेल्या गुहा इतकाच काय तो या लेण्यांचा घेर. मस्त फोटोग्राफी करून उतरून लगेच पुढच्या वाटेला लागलो. मग पोहोचलो ते तिकोणा किल्ल्याच्या अलीकडे "बेडसे लेण्यांच्या" पायथ्याशी. कामशेत मधून जेव्हा आपण "तिकोणा" किल्ल्याच्या रस्त्याला लागलो की एके ठिकाणी डोक्यावरून "एक्स्प्रेस हायवेचा" पूल जातो. तो ओलांडला की उजवीकडे जायला एक फाटा लागतो तो तुम्हाला घेऊन जातो "बेडसे लेण्यांकडे". साधारण ४५० पायऱ्या चढून गेल्यावर एक शंकराचे मंदिर आणि काही गुहा लागतात. एक गुहेत एक मोठा स्तूप लागतो. आणि मग विविध कोरलेल्या मूर्तींचे भग्न अवशेष आणि अफाट कलाकुसर दिसते. खरच आपण नशीबवान आहोत हे असलं सगळं आंपण बघू शकतो अख्खं मंदिर डोंगरातून कोरलेलं आहे. तेव्हा जेव्हा काहीच साधन सामुग्री उपलब्ध नव्हती तेव्हा. मग तिथे मस्त फोटोस काढून एकदाचे उतरला आणि परत "बब्बी दा ढाबा" मध्ये सुग्रास भोजन करून परत पोहोचलो आपापल्या घरी.
अश्या रीतीने आमचा वर्षातला पहिला प्रवास पूर्ण झाला. मागील वर्षात अर्थात २०११ मध्ये आम्ही साधारण ९ ट्रेक्स. ५ फोटोग्राफी साठी भटकंती आणि १ पावसाळी सहल ती पण मुंबईच्या पावसात इतकी प्रदिर्घ भटकंती केलीये. ह्याही वर्षी करूच.
पण खरच वर्षाच्या शेवटला आणि नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी रमणीय अशा ठिकाणी जाताना गाडीवर किंवा तिथे पोहोचल्यावर मन जरा भूतकाळात गेलं. मागील वर्षातल्या घटना, त्यांचे पडसाद आणि आपण केलेली प्रगती किंवा अधोगती, आलेले यश किंवा अपयश, वैयक्तिक किंवा सामाजिक आयुष्यातले चढउतार, ह्या सगळ्यांचा विचार मनात डोकावला.
भारताने वर्ल्ड कप जिंकला, जपानमध्ये त्सुनामी आली, अण्णा हजारेंचे आंदोलन, वाढलेले दर आणि महागाई, दहशतवादाचा अधिकच बळावलेला आणि भयाण खतरा, वाढते प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंग, $ च्या तुलनेने रुपयाचे घसरत जाणारे दर. अश्या अनेक सामाजिक घटनांनी हे वर्ष गाजवलं. ह्या सगळ्यांचा अप्रत्यक्षपणे काहीतरी परिणाम नक्कीच झाला आपल्या सगळ्यांवर. माझ्यावरही झाला.
वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणायचं तर नोकरीत झालेला महत्त्वपूर्ण बदल, ताईच्या छ्त्रछायेमधून बाहेर पडून वसतिगृहात राहायला केलेली सुरुवात, बिघडलेली तब्येत अश्या अनेक घटना आहेत. मुग्धा,सुकृत, शीतल आणि रोहन यांसारखे मिळालेले मित्र मैत्रिणी, त्यांच्या सोबत घालवलेले मजेचे, आनंदाचे आणि मस्तीचे क्षण, केतनमुळे मिळालेले ट्रेकिंगचे क्षण, ताई आणि जीजुन्सोबत घालवलेले मस्त मस्त क्षण आणि आई बाबांचा धाक आणि प्रेम ह्यांची सावली. ऑफिस मध्ये स्वानंद आणि निखील यांची साथसंगत अश्या अनेक प्रसंगांनी गाजलं माझं मागील वर्ष. ह्या सगळ्यांना धन्यवाद देत नाही कारण औपचारिकता नकोत. एक महत्त्वाचा उल्लेख राहिला तो म्हणजे मावशी आणि मामे भावंडांचा.
खर सांगू, लिहायचं म्हटलं ना तर वेळ आणि जागा कमी पडेल. पण एवढं सगळं आठवलं त्या भटकंतीत आणि एक विचार मनात आला, की पैसा, राजकारण, अण्णा हजारे, कोलावेरी डी, चिकनी चमेली, सचिनचे महाशतक, महागाई आणि दरवाढ, भ्रष्टाचार आणि काळा पैसा, ह्या सगळ्यापलीकडे आपल्याला गरज असते ती मनःशांतीची. खरच आपले मन किती वेळ एक अथांग शांतता अनुभवत? अशी शांतता जिथे कोणीच नसतं, काहीच नसतं, असतो तो फक्त आपण स्वतः.!!! आठवून बघा बरं सापडतो का एखादा क्षण? आठवतील पण मोजकेच किंवा अजिबात नसतील. का असं का?
ह्याचंच उत्तर या वर्षी शोधण्याचा प्रयत्न करायचाय आपल्या सगळ्यांना,. प्रत्येकाचे मनःशांती मिळवण्याचे पर्याय वेगळेवेगळे असतील पण पर्यायांकडे नेणारी वाट आणि पर्यायांचे परिणाम मात्र एकच आहेत. मला मात्र अश्या शांत आणि निर्मळ ठिकाणी अशी मनःशांती मिळते. बघा तुम्हाला कुठे मिळते ते? शोधा ते पर्याय आणि त्या वाटेवर चालूनतर बघा. मग हे वर्ष कसे मस्त जाईल बघा. विचार नका करू जास्त. फक्त मजा करा, काळजी घ्या आणि मला असेच भेटत राहा.



No comments:
Post a Comment